चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – किर्तनासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून सोने, चांदीचे दागिने व ४० हजार रोकड असा २ लाख ३४ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला जयशंकर नगरात झालेल्या या चोरीचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयशंकर नगर येथील किर्तनकार रविंद्र पाटील (वय-४५) ११ नोव्हेंबररोजी दुपारी घराला कुलूप लावून परिवारासह किर्तन करण्यासाठी धुळे येथे गेले होते. किर्तन आटोपल्यानंतर रविंद्र पाटील कुटुंबासह साडूकडे दोन दिवस थांबले. ते १४ नोव्हेंबररोजी दुपारी घरी परतले. तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले.
घराची पाहणी केली असता बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोने, चांदी व ४० हजार रुपये रोकड असे २,३४००० रुपयांचा ऐवज अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे दिसून आले. रविंद्र पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार भादंवि कलम- ३८०, ४५४ व ४५७ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो नि के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि आव्हाड हे करीत आहेत.







