पोलिसांचे तीन पथक छत्तीसगडमध्ये रवाना
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यापाऱ्याच्या नातेवाईकांसह तीन जणांचे अज्ञात ६ व्यक्तींनी कुसुंबा येथील साई सिटी येथून अपहरण करून परराज्यात नेले असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तीन पथकांना छत्तीसगड येथे रवाना करण्यात आले असून घटनेमध्ये या तीन व्यक्तींची सुटका करण्यासाठी एकाचे नातेवाईक असणाऱ्या व्यापाराला सुरुवातीला २५ लाख नंतर ८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. यापैकी एकूण १ लाख ९० हजार रुपये खंडणी म्हणून फिर्यादीने पाठवली आहे.
सागर कमल लुल्ला (वय २४, रा. नवजीवन सोसायटी, भुसावळ) असे फिर्यादीचे नाव आहे. ते शेअर मार्केटिंगचा व्यवसाय करतात. जळगाव येथील सिंधी कॉलनी येथे त्यांचे दुकान आहे. ते दररोज भुसावळ येथून अपडाऊन करतात. त्यांच्या पत्नीचा आतेभाऊ रोहित कैलास दर्डा (रा. टीव्ही टॉवर, भुसावळ), मित्र विशाल अनिल शुबवाणी (रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) हे काही दिवसांपासून कुसुंबा येथील अजय ठाकरे (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) येथे ऑनलाइन गेमिंग खेळत आहे. रविवारी दि. २ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी सागर लुल्ला यांना त्यांच्या मोबाईलवर मित्र विशाल शुबवाणी याच्या फोनवरून कॉल आला.
त्याने सांगितले की, आम्ही फसलो आहे. आम्हाला घेण्यासाठी रात्री १ वाजता सहा इसम आले आहे. त्यांना जर २५ लाख रुपये नाही दिले तर ते आम्हाला लखनऊ घेऊन जातील. तुम्ही २५ लाख रुपये द्या. त्यावेळी फिर्यादीने, त्यांच्याकडे एवढे पैसे नसल्याचे सांगत लगेच फोन बंद केला. मात्र पुन्हा त्यांच्या मोबाईलवर सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुसरा फोन आला. पलीकडून अज्ञात इसमाने सांगितले की, तुमको अगर तुम्हारे आदमी चाहिये तो जल्दी से जल्दी पैसे दो. असे म्हणून त्याने फोन विशाल शुबवाणी याच्याकडे दिला.
विशालने सांगितले की, आमचे या इसमांसह बोलणे झाले असून आमचे ८ लाख रुपयांमध्ये ठरले आहे. तू मला ८ लाख रुपये पाठवून दे. फिर्यादीने मात्र त्यांच्याकडे अडीच लाख रुपये असल्याबाबत सांगून असमर्थता दर्शवली. नंतर १० वाजता फिर्यादी सागर लुल्ला हे त्यांच्या सिंधी कॉलनी, जळगाव येथील दुकानावर गेले असता दुकानावर त्यांच्या ओळखीचे इसम आले व त्यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीत काम करणारा पवन याला मोबाईल फोनवर अजय ठाकरे यांचा फोन आला होता.
त्या फोनवरून कोणीतरी दुसऱ्या इसमाने सांगितले की, यांना लवकर पैसे द्या. नाहीतर आम्ही रोहित दर्डा, विशाल शुबवाणी, अजय ठाकरे यांना मारून टाकू, असे म्हणाले. त्यावेळी फोनच्या बाजूला अजय, रोहित आणि विशाल यांचे मोठमोठ्याने ओरडण्याचे आवाज येत होते. नंतर परत संध्याकाळी पवन याला फोन आला. पलीकडून बोलणाऱ्या अज्ञात इसमाने सांगितले की, आम्ही तुम्हाला सकाळपासून समजावीत आहोत. पण तुम्हाला समजून येत नाहीये असे बोलून त्याने अजय ठाकरे याचा रडण्याचा आवाज ऐकवला. यानंतर पलीकडले अज्ञात व्यक्तीने अजय ठाकरे याचा आयसीआय बँकेचा खाता क्रमांक पाठविला.
त्यानंतर फिर्यादी सागर लुल्ला यांनी अजय ठाकरे यांच्या अकाउंटवर पवनच्या खात्यावरून १ लाख २० हजार रुपये पैसे पाठविले. दुसरीकडे पैसे मागणीबाबत रोहित दर्डा याची बहीण पूजा दर्डा तिने देखील सांगितले की, रोहितला कोणीतरी किडनॅप केले आहे. त्याला सोडवण्यासाठी म्हणून समोरच्या व्यक्तींनी मागणी केली असे पूजाने फिर्यादी सागरला सांगितले. त्यानुसार ७० हजार रुपये फिर्यादीने संशयित आरोपींच्या खात्यावर टाकले.
अशाप्रकारे कुसुंबा येथील साई सिटी येथून रोहित दर्डा, अजय ठाकरे आणि विशाल शुभवाणी यांचे अज्ञात ६ इसमानी अपहरण करून घेऊन जाऊन त्यांना मारहाण करून सोडविण्यासाठी आमच्याकडे पैशांची मागणी केली आहे व ते पैसे स्वीकारले आहे. म्हणून फिर्यादी सागर लुल्ला यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनची पथके छत्तीसगडच्या दिशेने रवाना झाली आहेत. दरम्यान या घटनेमुळे जळगाव शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.