अपरिपक्व केळी तुटून पडत असल्याने होतोय चाऱ्यासाठी वापर
रावेर-यावल तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : रावेर-यावल तालुक्यातील अपरिपक्व केळी सुर्य आग ओकु लागल्याने मोडून जमिनीवर पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आधीच केळी भाव कमी झालेले आहेत. त्यात हा दुसरा फटका शेतकरी वर्गाला बसत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
केळीची अवघ्या ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री केली जात आहे. न परवडणारा भाव मिळत असला तरी पिक नाशवंत असल्याने कापणी करावी लागतच आहे. त्यामुळे बळीराजाचे अक्षरशा कंबरडे मोडले आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यातील भाग हा संपूर्ण राज्यभरात केळीच्या बागा म्हणून ओळखला जातो. मात्र या केळीला गेल्या वर्षी तसेच या वेळीही फार मोठे ग्रहण लागले आहे. यावर्षी ४४ ते ४६ पर्यंत तापमानाचा पारा चढला असल्याने अपरिपक्व केळीची झाडे व केळी देखील मोडून जमिनीवर पडत आहेत. तसेच निसवणीवर असलेल्या बागांचे घड जमिनीवर मोडून पडत आहे.
अशा मोडून पडलेल्या घडाचा वापर गुरांच्या चाऱ्यासाठी करावा लागत आहे. आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोण मदत करेल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसात केळीच्या भावात ३०० ते ४०० रुपयांनी वाढ झाली होती. त्याबद्दल जिल्हाभरातील केळी उत्पादकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले होते. मात्र आता शेतकरी दुसऱ्या संकटात सापडला आहे. त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी मदत करण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दमलेल्या राजकीय पुढाऱ्यांना पाहण्याकडे अद्यापि वेळ मिळालेला नाही. त्यामुळे केळी भाव वाढवावे, केळी बागांना उन्हापासून संरक्षण मिळण्याकरिता मदत मिळावी याकरिता शेतकऱ्यांनी एकमुखी मागणी केली आहे. तसेच, व्यापाऱ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.