जैन धर्मातील शलाकपुरुषांच्या यादीत ६३ वे स्थान असलेले कृष्ण वासुदेव एक निःस्वार्थ कर्मयोगी, एक आदर्श ज्ञानी, तत्वज्ञानी पुरुष होते. चांगल्या गोष्टींसाठी सतत सहकार्य करा, दोष नव्हे तर गुणांकडे बघा, तिसरी गोष्ट म्हणजे छल, कपट साम, दाम, दंड भेद अनिष्ठ युद्धात कधीच भाग घेऊ नका या वासुदेव श्रीकृष्ण यांच्या ३ गुणांचा अंगिकार केला तर निश्चित कल्याण होऊ शकते असे विचार परमपुज्य सुमित मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. आजच्या कृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने त्यांनी प्रवचनाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
काही शतकांपूर्वी कृष्ण होऊन गेले परंतु त्यांच्या गुणांमुळे त्यांचे आजही गुणगाण होते, ते पुजनीय ठरलेले आहेत. एकदा गुरू शिष्य रस्त्याने जात असताना अंत्ययात्रा चाललेली असते. ही अंत्य यात्रा जिवंत की, मृत पुरुषाची तपास कर. शिष्य म्हणाला जिवंत पुरुषाची अंत्य यात्रा होती कारण अंत्ययात्रेत सहभागी सर्वच त्या व्यक्तीचे गुणगाण करत होते. आपण गुणांचा स्वीकार करून आत्मकल्याण साध्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मानवाने आत्म्याशी सतत खेळ केलेला आहे. आता स्वतःकडे, आत्म्याकडे बघणे आवश्यक झालेले आहे. आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीराच्या माध्यमातून तप, आराधना करावी. कल्याण साध्य करायचे असेल तर अनन्यदर्शी बनायला हवे. स्वदर्शी, परदर्शी आणि सर्वज्ञदर्शी अशा तीन प्रकारांचे विवेचन करत अनेक उदाहरणे प.पू. महाराज साहेबांनी दिले. व्यक्ती, वस्तू, पद, मान, जीवन, वैभव, सुख हे सर्व संपणारे, नष्ट होणारे आहे. तसे पाहिले तर सुख हे पराधिन असते, दुसऱ्यावर अवलंबून असते. दुसऱ्यावर अवलंबुन असल्याने ते शाश्वत नसते. राजा, राणा, छत्रपती किती आले नी किती गेले. मिळालेला मनुष्य जन्म सार्थक करायचा असेल तर शरीराच्या माध्यमातून जप साधना करून घ्यावी. आत्म्याची उन्नती साध्य करावी असे आवाहन परमपुज्य ऋजुप्रज्ञ महाराज साहेब यांनी आजच्या प्रवनातून केले.