
नेमकी घटना काय?
मूळचे एकुलती येथील रहिवासी आणि सध्या जामनेर येथील दर्शन पार्क परिसरात स्थायिक असलेले गणेश पाटील हे रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी आपल्या मुलांसह स्विमिंग पूलवर गेले होते. गणेश पाटील हे तोंडापूर येथील एका शिक्षण संस्थेत क्लार्क म्हणून कार्यरत आहेत.
संध्याकाळी पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर पाटील आपल्या मुलांना घेऊन कपडे बदलण्यासाठी रूममध्ये गेले. याच दरम्यान, छोटा कार्तिक आऊटलेटमधून वाहणारे पाणी पाहण्याच्या ओढीनं पुढे गेला. पाण्याचा आनंद घेण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो थेट आऊटलेटचे पाणी जमा होणाऱ्या चेंबरमध्ये पडला. चेंबरमध्ये पाणी असल्याने त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
सुरक्षेच्या अभावामुळे घात झाल्याचा आरोप
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी कार्तिकचा शोध घेण्यासाठी स्विमिंग पूलच्या पाण्यात धाव घेतली. मात्र, सुरुवातीला कोणाचेही लक्ष आऊटलेटच्या चेंबरकडे गेले नाही. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तो चेंबरमध्ये आढळून आला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या दुर्घटनेनंतर कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी प्रशिक्षित ट्रेनर किंवा सुरक्षा रक्षक तैनात नसल्यामुळेच कार्तिकला वेळेवर मदत मिळू शकली नाही, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. जर तिथे सुरक्षा रक्षक असता, तर कदाचित कार्तिकचा जीव वाचला असता, अशी हळहळ उपस्थित लोकांनी व्यक्त केली.
पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर
मृत कार्तिकच्या पश्चात आई, वडील, ११ वर्षांची मोठी बहीण, आजी-आजोबा आणि काका-काकू असा मोठा परिवार आहे. सुटीचा आनंद घेण्याचे नियोजन असलेल्या पाटील कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









