मुंबई – कुठे महाआरती… कुठे ढोलताशांचा दणदणाट… गुलालाची उधळण… घोषणाबाजी… तर कुठे पेढे वाटप… राज्यातील धार्मिकस्थळे आजपासून उघडण्यात आल्याने भाजपने राज्यभरातील प्रमुख मंदिरांसमोर अत्यंत जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भाविक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी गजबजून गेला होता.

तब्बल आठ महिन्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर आज राज्यातील मंदिरे उघडण्यात आली. भाजप, वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, संघटना, धार्मिक संघटनांच्या आंदोलनानंतर राज्यातील धार्मिकस्थळे अखेर उघडण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने आज राज्यातील सर्व प्रमुख मंदिरांजवळ जाऊन प्रचंड जल्लोष केला. तसेच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्त्रही सोडलं. भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात जल्लोष करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी कदम यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. सरकार बदल्यात गुंतले होते. त्यामुळे मंदिरासाठी जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं. साधूसंत क्रोधित झाले, त्यामुळे सरकार घाबरले आणि त्यांना मंदिरं उघडण्याचा निर्णय घ्यावाच लागला. हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे, असं राम कदम म्हणाले. आम्ही पालघरमधील साधूंचं हत्याकांड विसरलो नाही. चित्रगुप्ताच्या दारी या तीन पक्षाच्या सरकारला शाप मिळणार आहे, असं सांगतानाच पालघर प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जावं हेच सिद्धिविनायकाला साकडं घालत असल्याचंही कदम म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात दहिसर पूर्व येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एक स्टॉल मांडून त्यावर पणत्या पेटवण्यात आल्या. यावेळी ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी दरेकर यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकरही उपस्थित होते. तर, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या नेतृत्वात चेंबूरमधील गणेश मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी मंदिरात पूजा करून कोरोना नष्ट करण्याचं साकडं देवाला घालण्यात आलं.
माहीम चर्च सुरू
कोरोनामुळे बंद असलेलं माहीमचं प्रसिद्ध चर्चही सुरू झालं आहे. मात्र केवळ 150 भाविकांनाच चर्चमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाच्या संकटानंतर आठ महिन्यांनी चर्च सुरू होत आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोना नियमांचं पालन करण्यात येणार असल्याचं फादर फादर लेन्सी पिटो यांनी सांगितले.
डोंबिवलीत भाजप आमदाराचं मंदिरासमोर नृत्य
डोंबिवलीत गणेश मंदिर उघडण्यात आल्यानंतर भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह मंदिरासमोरच नृत्य करत फेर धरून आनंद व्यक्त केला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत देवाचं दर्शन करण्यात आलं.
पंढपुरात एक हजार भाविकांनाच प्रवेश
पंढपुरातील विठ्ठल मंदिरही उघडण्यात आल असून भाविकांनी विठूरायाचं दर्शन घेतलं. यावेळी कोरोना नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. विठ्ठल मंदिरात दररोज एक हजार भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग सक्तीची करण्यात आली आहे.
चंद्रपुरात मुनगुंटीवारांची महाआरती
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपूरच्या महाकाली मंदिरात जाऊन भाजप कार्यकर्त्यांसोबत महाआरती केली. या वेळी त्यांनी सरकारचे अभिनंदन करतानाच मंदिरं सुरू करण्यास लावलेल्या उशिराबाबत सरकारवर ताशेरे ओढले. दिवाळीच्या मुहूर्तावर सरकारच्या डोक्यातला अंधार दूर झाला आणि मंदिरं सुरू करण्याचा प्रकाश त्यांच्या डोक्यात पडला, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. सरकारने राजकारण न करता तर्काच्या आधारावर निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
शिर्डीत भाविकांचं स्वागत
शिर्डीचं साई मंदिरही भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आलं असून माध्यान्ह आरतीला येणाऱ्या भाविकांच अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. यावेळी साई संस्थानने औक्षण आणि फुलांचा वर्षाव करत भाविकांचं पारंपारिक पद्धतीनं स्वागत केलं.
दगडूशेठ मंदिरात महाआरती
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही श्रीमंत दगडूशेठ बाप्पाची आरती केली आणि पुणेकरांना सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घेण्याचं आवाहन केले. मंदिरे उघडावीत ही भाविकांची मागणी होती. भाजपनेही त्यासाठी आंदोलन केलं होतं. त्यामुळे उशिराने का होईना सरकारला मंदिरं खुली करण्याचं शहाणपण सुचल्याचं महापौरांनी म्हटलंय
महालक्ष्मी मंदिरात भाविकांची गर्दी
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात आज सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोल्हापूर शहरातील कोविड योद्ध्यांचा सत्कार करून देवदर्शन केले. भाविकांनीही देवदर्शन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरही आजपासून भाविकांसाठी उघडण्यात आले आहे. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच मंदिरं उघडण्यात आली आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
अक्कलकोटमध्ये महाआरती
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात आज आठ महिन्यानंतर पहिली सार्वजनिक आरती करण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात स्वामी समर्थ महाराज की जयचा जयघोष दुमदुमला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते मंदिराचा मुख्य दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आला आहे. मंदिर खुले करण्यात आल्यानंतर स्थानिक नागरिकांबरोबरच इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचे दर्शन घेऊन समाधान आणि आनंद व्यक्त केला.







