सामुदायिक शौचालय अभियानात उत्कृष्ट कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) – सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धेत देशपातळीवर तृतीय क्रमांकाचा मानकरी जळगाव जिल्हा ठरला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१व्या जयंतीचे औचित्य साधून आज २ ऑक्टोबर रोजी व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने जिल्ह्याचा गौरव करण्यात आला. केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी प्रशस्ती पत्र आणि मानचिन्ह देऊन जिल्ह्याचा ऑनलाईन सन्मान केला.
जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा.लोखंडे आदींनी ऑनलाईन पुरस्कार स्विकारला. या राष्ट्रीय पुरस्काराने जळगाव जिल्ह्याचा स्वच्छतेच्या कार्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडलेल्या व्हर्चुअल पुरस्कार वितरण कार्यक्रमाला कनिष्ठ प्रशासन अधिकारी ऋषीकेश भदाणे, जलनिरीक्षक दिपक राजपूत,संवादतज्ञ निलेश रायपूरकर आदींची उपस्थिती होती. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम, सौंदर्यीकरण व देखभाल व्यवस्था या बाबींना प्रोत्साहीत करण्यासाठी सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धा आयोजित केली होती. ग्रामीण भागात शौचालयाचा नियमित उपयोग वाढविणे, गावस्तरावर स्वच्छता साधनांविषयीची स्वमालकीची भावना वाढविणे आणि सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम होऊन त्याची देखभाल होण्याच्या उद्देशाने १५ जून ते १५ सप्टेंबर या तीन महीन्याच्या कालावधीत ही स्पर्धा घेतली होती. केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाने घोषीत केलेल्या सामुदायीक शौचालय अभियान स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक जिल्ह्याने पटकाविला.
शुक्रवारी २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता दिवस म्हणून देशभरातील विविध पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या जिल्हा व ग्राम पंचायतींचा गौरव करण्यात आला. वितरण कार्यक्रमात केंद्र स्तरावर जल शक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पी. सिंग, अपर सचिव अरूण बारोका यांची उपस्थिती होती.







