जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील ८२ गावांना १०१ टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर १३७ गावांमधील १५७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकीकडे उन्हाचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे. याकरता टँकरद्वारे व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा केला जात आहे.
जळगाव जिल्हा हा तापमानासाठी ओळखला जातो. सध्या जळगाव जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४६ अंशावर येऊन ठेपले आहे. दुपारी उन्हाच्या लाटा सुरू आहे. असे असताना पंधरा तालुक्यांमधील ८२ गावांमध्ये १०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर १३७ गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी १५७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, चोपडा या तालुक्यांमध्ये एकही टँकर अद्याप सुरू झालेले नाही. मात्र यावल तालुका सोडल्यास जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये विहिरींचे अधिग्रहण झालेले आहेत.