एसपी कार्यालयात प्रथमच विशेष संवाद बैठक; सायबर फसवणुकीपासून सुरक्षेपर्यंत विविध विषयांवर मार्गदर्शन
जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षितता आणि कल्याणासाठी जळगाव जिल्हा पोलिसांच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची बैठक आयोजित करण्यात आल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.


बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षकांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, मालमत्तेसंबंधी वाद, कौटुंबिक समस्या, आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती तसेच परिसरातील सुरक्षेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बँक अधिकारी, पोलीस किंवा सरकारी अधिकारी असल्याचे भासवून होणारी फसवणूक, केवायसी अपडेटच्या नावाखाली होणारे प्रकार, ओटीपी मागवून खात्यातील रक्कम काढणे, यूपीआय व क्यूआर कोडद्वारे होणारी फसवणूक, बनावट गुंतवणूक योजना, डिजिटल अरेस्ट, सोशल मीडियावरील फसवे संदेश आणि ऑनलाइन खरेदीतील फसवणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद फोन कॉल किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले. कोणतीही फसवणूक झाल्यास तातडीने पोलीस किंवा सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला.
घरफोडी, चोरी, मालमत्तेची फसवणूक, बनावट ओळख सांगून होणारे गुन्हे यापासून बचाव करण्यासाठी घरगुती मदतनीस, केअरटेकर यांची योग्य पडताळणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच शेजाऱ्यांशी आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क कायम ठेवून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत कशी मिळवता येईल, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षकांनी आपल्या मनोगतात ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ असून त्यांची सुरक्षा, सन्मान आणि कल्याण ही जळगाव पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले. त्यांच्या समस्या संवेदनशीलतेने हाताळून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीत सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. पोलिसांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने मनातील अनेक प्रश्न आणि समस्या मांडता आल्या, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जळगाव पोलिसांचा हा अभिनव उपक्रम समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि समुदायाभिमुख पोलिसिंगची बांधिलकी अधोरेखित करणारा ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.









