समितीच्या बैठकीत निर्णय ; ३० जूनला मुंबईत विराट मोर्चा
मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप,भाकप माले,शेकाप,सकप, लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष – संघटनांनी केला आहे. याअंतर्गत २२ एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय मुंबईतील भुपेश गुप्ता भवन येथे आयोजित बैठकीत करण्यात आला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी अध्यक्षस्थानी होते. बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकारी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारत जोडो अभियान, कामगार एकता कमिटी, नारी अत्याचार विरोधी मंच आदी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती स्थापन करून तातडीने कृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा, याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच ३० जून रोजी मुंबई येथे सुरू होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला.
तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार – प्रसार करुन, सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा, विधान परिषदेत भूमिका मांडण्याबाबत दबाव निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. डॉ. अजित नवले, ‘आयटक’चे राष्ट्रीय सेकेरटरी कॉ. सुकुमार दामले, शेकाप चे भाई ॲड. राजेंद्र कोरडे, कॉ. विजय कुलकर्णी, कॉ. शैलेंद्र कांबळे, कॉ. डॉ. एस. के. रेगे, कॉ. चारुल जोशी, कॉ. गिरीश भावे, कॉ. लता भिसे-सोनवणे, डॉ. अनुराधा रेड्डी, संध्या गोखले, सुजाता गोठुसकर, सूर्यकांत के. शिंगे, कॉ. प्रा. सुभाष जाधव, संकल्पना कऱ्हाडे, प्राची हातिवलेकर, गणेश बाईत, सुनिल मन्वर आदी प्रमुख उपस्थित होते.
तसेच सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ किशोर ढमाले, श्रमिक मुक्ती दलाचे कॉ भारत पाटणकर, प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, उल्का महाजन, यांनी फोन वरून संपर्क साधून जनसुरक्षा विधेयक विरोधी समितीने ठरवलेल्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी कळवले आहे.