रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरामध्ये एक धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले आणि सध्या जळगावात वॉचमनचे काम करणाऱ्या कुटुंबातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला एका अज्ञात इसमाने काहीतरी अमिश दाखवून फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कमलाबाई कैलास पावरा (वय ४० वर्षे, व्यवसाय-वॉचमन, मूळ रा. नंदोखल्या, ता. वरला, जि. बडवाणी, राज्य-मध्य प्रदेश, ह.मु. साईबाबा मंदिराजवळ, हरी विठ्ठल नगर, जळगाव) या आपल्या कुटुंबासह जळगाव शहरातील सोप संदीप अपार्टमेंट, हरी मंदिर प्रतिष्ठानजवळ वॉचमन म्हणून काम करतात. त्यांचा १७ वर्षे ११ महिने २२ दिवस वय असलेला अल्पवयीन मुलगा पुनित कैलास पावरा हा गुरुवार, २१ मे २०२६ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास अचानक बेपत्ता झाला. कुटुंबाने त्याचा सर्वत्र शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली, परंतु त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
अल्पवयीन पुनितचा शोध न लागल्याने अखेर रविवारी, २४ मे २०२६ रोजी सायंकाळी त्याच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १३७(२) प्रमाणे पळवून नेल्याचा (अपहरणाचा) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक संजय शेलार करत आहेत.









