बहिणीवरील संशयाच्या रागातून भावासह चौघांना मारहाण; कोल्हे हिल्स परिसरातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर मोहन जयराज (वय ३४, व्यवसाय एअर कंडिशनर दुरुस्ती, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) यांचा पत्नी आरती रमेश लोखंडे हिच्यावर चारित्र्याचा संशय असल्याने वाद झाला होता. या कारणावरून आरती हिला राग आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
१६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आरती रमेश लोखंडे, विमला वसंत पवार, किरण वसंत पवार आणि कार्तिक रमेश लोखंडे हे सर्वजण शिवाजी नगर परिसरातून फिर्यादीच्या घरी गेले. तेथे त्यांनी फिर्यादीचा भाऊ राहुल मोहन जयराज व त्यांची पत्नी प्रभा किशोर जयराज यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याचवेळी आरोपी क्रमांक ३ किरण वसंत पवार याने राहुल यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकूने छाती व पाठीवर वार केल्याने तो जखमी झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. घटनेनंतर जखमी राहुल याच्यावर उपचार करण्यात आले.
या प्रकरणी किशोर जयराज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. श्री. विजय दे. पाटील करीत आहेत. गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याची नोंद पोलिस कागदपत्रात आहे.









