बऱ्हाणपूरच्या मूर्तिकारावर फसवणुकीचा आरोप; ४७ हजार रुपये देऊनही मूर्तीचे काम अपूर्ण असल्याचा मंडळाचा दावा
जळगाव (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तब्बल ४७ हजार रुपये खर्च करून आणलेली १२ फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापनेपूर्वीच दुभंगल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील नवी पेठ परिसरात समोर आला आहे. जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. १० सप्टेंबर) सायंकाळी मूर्तीवरील आवरण काढून पाहिले असता मूर्ती दुभंगल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून, बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराने पूर्ण रक्कम घेतल्यानंतरही मूर्तीचे काम व्यवस्थित पूर्ण न करता घाईघाईने ओली मूर्ती मंडळाच्या ताब्यात दिल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.


जय महाराष्ट्र मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवासाठी बऱ्हाणपूर येथील मूर्तिकाराकडून १२ फूट उंचीची गणेशमूर्ती तयार करून घेतली होती. त्यासाठी मंडळाने मूर्तिकाराला सुमारे ४७ हजार रुपये अदा केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशमूर्ती जळगावकडे वाहतूक करून आणली जात असताना वाटेतच ती दुभंगली. मात्र, मूर्ती झाकून ठेवण्यात आल्याने हा प्रकार तत्काळ मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आला नाही.
गुरुवारी सायंकाळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मूर्तीवरील आवरण काढून पाहिले असता मूर्तीची दुभंगलेली अवस्था त्यांच्या निदर्शनास आली. गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहाने आणलेल्या मूर्तीचे असे नुकसान झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि हळहळ व्यक्त करण्यात आली.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मूर्ती पूर्णपणे वाळलेली नसतानाच ती घाईघाईने मंडळाच्या ताब्यात देण्यात आली. मूर्तीचे कामही पूर्णपणे व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ओली मूर्ती वाहतुकीदरम्यान ताण आल्याने दुभंगली असावी, अशी शक्यताही मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्ण रक्कम अदा करूनही अपेक्षेप्रमाणे मूर्ती तयार करून न दिल्याने आपली आर्थिक व मानसिक फसवणूक झाल्याचा आरोप मंडळाने केला आहे.
मंडळाचे पदाधिकारी भूषण जोशी यांनी माध्यमांशी बोलताना मूर्तिकाराने पूर्ण पैसे घेतल्यानंतरही मूर्तीचे काम व्यवस्थित केले नसल्याचा आरोप केला. ओली मूर्ती घाईघाईने जळगावला पाठविण्यात आल्याने ती वाहतुकीदरम्यान दुभंगली. या प्रकारामुळे मंडळाचे आर्थिक नुकसान झाले असून, गणेशभक्तांच्या भावनांनाही धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.दुभंगलेली मूर्ती गणेशोत्सवासाठी वापरणे शक्य नसल्याने तिचे आज शुक्रवारी मेहरुण तलावात विसर्जन करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला. यावेळी जय महाराष्ट्र मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या प्रकारामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, मूर्तिकाराच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित मूर्तिकाराविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.








