स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : सुरत येथे १६ लाख रुपयांची सुपारी घेऊन दोघांचे खून केल्याप्रकरणी फरार दोघा कुविख्यात गुन्हेगारांना जळगावच्या अजिंठा चौफुलीवर एलसीबीच्या पथकाने शिताफिने अटक करून ताब्यात घेतले आहे. यातील एकाने यापूर्वी सुपारी घेऊन ५ खून केल्याचे उघड झाले असून एलसीबीला मोठे यश प्राप्त झाले आहे.
सुरत येथील उमरपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ८ जून २०२४ रोजी सुरतचे खुर्शीद अली सय्यद यांनी १६ लाख रुपयांची सुपारी दिल्यावरून बिलाल चांदी आणि अज्जू नामक दोन जणांचा गळा कापून जीवे ठार मारल्याची घटना घडली होती. सदर घटनेमध्ये गुन्हेगार अफजल अब्दुल शेख (वय ३८, रा. उमरपाडा मशिदीजवळ, सुरत) आणि प्रज्ञेश दिलीप गामीत (वय २६, रा. डोंगरी फलिया, ता. व्यारा जि. तापी) हे २ जण फरार झाले होते. सुरतचे पोलिसांनी ११ पथकाद्वारे त्यांचा शोध सुरू ठेवला होता.
दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे निरीक्षक बबन आव्हाड यांना सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी सूचना दिला होत्या. गुरुवार दि. २७ जून रोजी एलसीबी पथकातील हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली.(केसीएन)त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, हेडकॉन्स्टेबल सुधाकर आंभोरे, अक्रम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन अशांच्या पथकाने अजिंठा चौफुली येथे धाव घेतली. त्या ठिकाणी दोन्ही गुन्हेगार अफजल शेख आणि प्रज्ञेश गामीत हे मिळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी बिलाल चांदी आणि अज्जू यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान अफजल शेख याच्यावर यापूर्वी सुपारी घेऊन पाच खून केल्याचे गुन्हे दाखल आहेत. तर प्रदनेश गामीत हा गुन्हेगार असून त्याच्यावर १५ गुन्हे दाखल आहेत.(केसीएन)सदर पथकाच्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी कौतुक केले आहे.