महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ३६ प्रकरणांवर झाली सुनावणी
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने “बाल हक्क आयोग आपल्या दारी” ऑगस्ट २०२४ रोजी आयोगामार्फत सकाळी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सुनावणी दरम्यान ३६ प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली आहे .बाल हक्काशी व त्यांच्या अधिकाराच्या बाबतीत कोणतीही हयगय चालणार नाही. ज्या ठिकाणी हलगर्जीपणा आढळेल त्यांच्यावर उचित कारवाई करण्याचे निर्देश यावेळी आयोगाने दिले.
सदर सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सायली पालखेडकर, सदस्य चैतन्य पुरंदरे, विधी सल्लागार प्रमोद बाडगी, शिक्षणाधिकारी माधवी भोसले, उज्वला होवाळ, कनिष्ठ काळजीवाहक अजय लोंढे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते. सुनावणीचे आयोजन दि. ९ रोजी सकाळी १०.३० वाजता अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे करण्यात आले होते.
सदर सुनावणीमध्ये आरटीई कायद्याशी संबंधित प्रकरणे, पॉक्सो, बालमजुरी, बालविवाह आदी विषयांशी संबंधित प्रकरणांची सुनावणी पार पडली. सदर सुनावणीच्या माध्यमातून आयोगाने जळगांव, धुळे जिल्ह्यातील तक्रारदारांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकूण घेतले. तसेच त्या प्रकरणांमध्ये असमाधानकारक माहिती मिळाली त्याठिकाणी संबंधित प्रशासनाला योग्य ते निर्देश देवून तक्रारदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.