NHAI कंत्राटदार कंपनीवर अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नगरसेवक अरविंद देशमुखांच्या दणक्याने प्रशासन हलले; एमडी शैलेंद्र सिंघल, जीएम दत्ता यांच्यासह अधिकाऱ्यांवर कारवाई!
जळगाव: राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी-जळगाव नवीन बायपासच्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व अपुऱ्या सुरक्षेमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असताना, सातत्याने प्रशासनाचे डोळे उघडणारे नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या आक्रमक पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. बारंवार निवेदने आणि धोक्याचे इशारे देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या ‘ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या NHAI च्या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंघल, जी. एम. दत्ता आणि संबंधित साईट अधिकाऱ्यांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सरकारतर्फे थेट सदोष मनुष्यवधाचा (BNS कलम १०५) गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पावसामुळे बायपासवरील ओव्हरब्रिजचा भराव खचल्याने अपघातांची मालिका सुरू झाली होती. ८ ऑगस्ट २०२६ पासून नगरसेवक अरविंद देशमुख यांनी NHAI ला तीन वेळा निवेदने देऊन, पोलीस प्रशासनाकडे गुन्ह्याची मागणी करत आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय चौकशीचा पाठपुरावा केला होता. या कालावधीत मंगला माळी, प्रेमराज चौधरी, योगेश महाजन आणि अनिरुद्ध डहाके या नागरिकांना प्राणाला मुकावे लागले होते. तरीही प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्याने ३० ऑगस्टच्या मध्यरात्री ममुराबाद-आसोदा बायपासवर तवेरा व ट्रकचा भीषण अपघात होऊन शांताराम पाटील (रा. शिंदखेडा) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर तालुका पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत सरकारतर्फे गुन्हा क्र. २६२/२०२६ नोंदवला. यात बीएनएस कलम १०५, २९०, ३(५), मोटार वाहन कायदा १९८-अ सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलमे लावण्यात आली आहेत. “हा गुन्हा दाखल होणे ही केवळ सुरुवात असून निष्पाप बळी घेणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असा घणाघाती इशारा नगरसेवक अरविंद देशमुख यांनी दिला आहे.









