४ दिवसांत करा अर्ज : जळगावच्या समाज कल्याण विभागाचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे पहिल्या टप्प्यासाठी अर्ज मागविणे जळगाव समाजकल्याण विभागाने सुरु केले आहे. त्यासाठी दि.१३ सप्टेंबर रोजीपर्यत अर्ज करावे, असे आवाहन केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी अयोध्या हे स्थळ निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरीक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेतील पात्र व्यक्तींच्या प्रवासाचा, राहण्याचा व भोजनाचा खर्च शासना मार्फत करण्यात येणार आहे. सदर योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयासाठी १ हजार लाभार्थ्याचे उदिष्ट देण्यात आलेले आहे. या योजनेचे अर्ज ऑफलाईन पध्दतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मुख्याधिकारी, नगरपरिषद / नगरपंचायत किंवा सहायक आयुक्त, समाज, कल्याण, कार्यालय पत्ता-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, जळगाव येथे सादर करावेत.
सदर योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची अंतीम मुदत ही दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यत आहे. योजनेसाठीचे अर्ज गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व सहायक आयुक्त कार्यालयात उपलब्ध आहेत. उदिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्याची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल, असे सहायक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी कळविले आहे.