जुलैत भरपूर पावसाची अपेक्षा
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील गिरणा, हतनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज या चार महत्त्वाच्या प्रकल्पांमधील धरणांपैकी गिरणा धरणामध्ये १२ टक्के तर हतनूर मध्ये २५ टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तर वाघूर मध्ये ५४ तर शेळगाव बॅरेज मध्ये ३५ टक्के पाणीसाठा आहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात १३५७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. जुलै महिन्यात पुरेसा पाऊस अजून अपेक्षित आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्य धरणे असून त्यामध्ये गिरणा, हातनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज यांचा समावेश होतो. यामधून गिरणा व हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात सिंचन, औद्योगिक वसाहत व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जात असतो. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा हतनूरमधूनच होतो. वाघुर धरणातून जळगाव, जामनेर या भागातील गावांना पाणी पुरवठा होतो. पावसाचे वेध शेतकऱ्याला लागलेले असतांना यावेळी पावसाने जून महिन्यात समाधानकारक हजेरी लावली. तर रोहिण्या व मृग ही पावसाचे नक्षत्र आता संपलेली असून अरगडा नक्षत्र सुरू झालेले आहे. या नक्षत्रात पावसाचा जोर विशेष असतो. शेतकऱ्याने पेरणी केलेली असून नुकत्याच आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मात्र वर्षभर पुरेल इतका मुबलक पाणीसाठा अजूनही धरणामध्ये जमा झालेला नाही.