चोपडा शहरात फायनान्स कंपनीच्या तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
चोपडा (प्रतिनिधी) : भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड या संस्थेच्या चोपडा शाखेच्या तिघा क्षेत्र सहायक यांनी ग्राहकांकडून हप्त्यांचे पैसे घेऊन कार्यालयात जमा न करता तब्बल ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या तिघा फिल्ड असीस्टंट विरोधात चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत फायनान्सशियल इन्कूलजन लिमीटेड चोपडा शाखेत कैलास भागचंद राठोड (वय २६ वर्ष, गणेशनगर खडकी ता. एरंडोल), कल्पेश संतोष पाटील ( वय २५ वर्ष रा. भालगाव ता .एरंडोल), दिगंबर अभिमान खिल्ले (वय-२८ वर्ष रा. अनफवाडी पोस्ट आर्षी ता. जि धुळे) या तिघांनी संगनमत करुन अपहार केला आहे. त्यांच्याकडे फिल्डवर जाऊन कर्जदार ग्राहकांकडून हप्त्याचे पैसे गोळा करुन शाखेत रोखपालाकडे जमा करण्याचे काम होते. मात्र, या तिघांनी दि. ६ जानेवारी २०२३ ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ग्राहकांकडून हप्ते घेऊन त्याचा शाखेत भरणाच केला नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
यात कैलास भागचंद राठोड याने २१ ग्राहकांची हप्त्याची रक्कम ७ लाख ३४ हजार ३०४ रुपये तसेच कल्पेश संतोष पाटील याने १४ ग्राहकांची हप्त्याची रक्कम २ लाख ७९ हजार ७३२ रुपये, दिगंबर अभिमान खिल्ले याने १४ ग्राहकांची १ लाख ३८ हजार ५०३ रुपये अशी ग्राहकांकडुन जमा एकूण ११ लाख ५२ हजार ५३९ रुपयांची हप्त्याची रक्कम बँकेच्या कार्यालयात न जमा करता संगनमत करुन अपहार केला आहे. ही रक्कम स्वतः जवळ ठेवुन त्या रकमेचा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे दिसून आले आहे. बैंकेची तसेच कर्जदार (ग्राहक) यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात तसेच फसवणुक केल्याप्रकरणी शनिमंदिर चौकातील भारत फायनान्स इंडसइंड बॅंकचे व्यवस्थापक वासुदेव कैलास पाटील यांनी तिघांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चोपडा पोलिस निरीक्षक मधुकर सावळे यांचा मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल रघुनाथ भुसारे करत आहे.