सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक ही सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच उन्नती अन् प्रगती करीत असून यंदा बँकेला १ कोटी ६३ लाखांचा नफा झाल्याचे बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची २६ वी वार्षिक सभा चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे व्हा. चेअरमन सोनू भंगाळे, शालीग्राम चौधरी, तज्ज्ञ संचालक हेमचंद्र वायकोळे, संचालक सुभाष पाटील, तज्ज्ञ संचालक सीए सुनील महाले, चंद्रकुमार चौधरी, सुरेश झोपे, डॉ. संपत वानखेडे, डॉ. चंद्रसिंग पवार, हरिष फालक, लिलाधर चौधरी, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, आशाताई तळेले, संगीताताई चौधरी, यमुनाबाई महाजन, डॉ. सौरभ पाटील,स्मिता चौधरी, प्रमोद पटेल व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, गोदावरी लक्ष्मी बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून १०८ कोटी ३१ लक्ष रूपयांपर्यंत ठेवी झाल्या आहेत. वसूल भागभांडवल ६ कोटी १ लक्ष असून एनपीए केवळ ०.९० टक्के आहे. बँकेला लेखापरिक्षणात अ दर्जा प्राप्त झाला असून यंदा १ कोटी ६३ लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या कार्याची माहिती दिली. सभेमध्ये १० विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच उपस्थित सभासदांना आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्यात आले. आभार संचालिका आशाताई तळेले यांनी मानले.










