जळगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा नदीवरील गिरणा धरण आज 90 टक्के भरले धरण क्षेत्रात पुराचे पाणी वेगाने येत असल्याने धरण भरण्याची शक्यता लक्षात घेऊन दुपारनंतर गिरणा धरणातून 25 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अग्रवाल यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
गिरणा नदीच्या उगम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. नदी पात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. आज सकाळी 11 वाजेपर्यंत गिरणा धरण 90 टक्यांपर्यंत भरले आहे. दुपारपर्यंत धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे. दुपारनंतर 25 ते 30 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गिरणा पात्रात सोडण्यात येणार आहे. मन्याड धरणातूनही गिरणा नदीत 19 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी. नदीत जावू नये, जनावरे नदीजवळ जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांच्यासह कार्यकारी अभियंता अग्रवाल, उपविभागीय अभियंता हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी केले आहे.







