चाळीसगाव ;- कोरोनाच्या संकटामुळे देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे. अश्या स्थितीत देशातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी केंद्र सरकारने 1 लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तसेच पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्राच्या पंतप्रधान सहाय्यता निधी (PMCARES) ला देखील देशभरातील उद्योजक, नोकरदार, मध्यमवर्गीय व सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या मदतीतून हजारो कोटी रुपये मदत उभी राहत आहे.
लॉकडाऊनचा परिणाम शेती क्षेत्रावर देखील झाला असून मागील अनेक वर्षांपासून दुष्काळाने होरपळत असलेला शेतकरी वर्ग देखील यामुळे अडचणीत आला आहे. मात्र पिलखोड येथील शेतकरी विजय अभिमन्यू पाटील यांचे चिरंजीव तन्मय हा अश्वमेध पब्लिक स्कूल येथे इयत्ता ४ थी त शिक्षण घेत आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे जनतेला मदतीसाठी आवाहन करण्याचा व्हिडीओ संदेश टीव्ही वर पाहिला. आपण देखील खारीचा वाटा यासाठी उचलावा म्हणून त्याने त्याला आईवडील, नातेवाईक यांच्याकडून खाऊ साठी मिळालेल्या पैश्यांचा गल्ला पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर पिलखोड येथील आमदार मंगेश चव्हाण यांचे मित्र महेश सोनार यांनी तन्मय ला घेऊन आमदार मंगेश चव्हाण यांचे कार्यालय गाठले. आमदार चव्हाण यांनी तन्मय ची इच्छा एकूण घेतली, जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी वर्ग आज अडचणीत असताना सुद्धा तन्मयच्या दातृत्वाची भावना व त्याच्यावर झालेले संस्कार पाहून त्यांना गहिवरून आले. तन्मय ने आपला खाऊचा गल्ला आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करत ही मदत मोदिजींकडे पोहचवण्याची विनंती केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील तन्मयचे कौतुक करत भारताची भावी पिढी जर अश्या विचारांची असेल तर कोरोना सारखी कितीही संकटे आली तरी देशाला महासत्ता होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही, तन्मयचा आदर्श सर्वांनी घ्यावा व सढळ हाताने पीएम केअर्स निधीला मदत करावी असे आवाहन केले. आमदार चव्हाण यांनी गल्ला उघडून त्यातील ५९३ रुपये हे तन्मयच्या नावाने भीम अॅप वरून पीएम केअर्स निधीत जमा केले.