जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तीन महिन्यांच्या बोलीवर जावयाकडून घेतलेले पाच लाख रुपये परत न देता मानसिक त्रास देणाऱ्या सासू व शालकाविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत नारायण वानखेडे (५१, रा. मू.जे. महाविद्यालयाच्या मागे) यांनी फिर्याद दिली आहे. जुलै २०१६ मध्ये वानखेडे यांचा शालक अजय चिंधू डोळे (रा. भुसावळ) व सासू मालती चिंधू डोळे (रा. भालोद, ता. यावल) यांनी तीन महिन्याच्या बोलीवर पाच लाख रुपये उसनवारीने घेतले. चार महिन्यांनंतर वानखेडे यांनी शालकाकडे पैशाची मागणी केली असता त्याने टाळाटाळ केली.
पैशासाठी तगादा वाढतच असल्याने शालकाने ५० हजारचे दोन धनादेश वानखेडे यांना दिले. मात्र ते बाऊन्स झाले. त्यामुळे त्यांनी शालकाला वकीलामार्फत नोटीसही पाठवली होती. वानखेडे यांनी पुन्हा पैशाचा तगादा लावल्याने शालकाने मी शाळेतून राजीनामा देवून टाकतो आणि माझ्या जीवाचे बरे वाईट करुन घेईल, अशी धमकीदेखील दिली. शालकासह सासूकडून धमकी मिळत असल्याने वानखेडे यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
तक्रारदार वानखेडे यांनी विधी सेवा केंद्रात दाद मागून तडजोडीसाठी पत्रव्यवहार केला. मात्र शालक व सासू दोघेही उपस्थित राहिले नाही. पैसै न मिळता फसवणूक होत असल्याने वानखेडे यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अजय चिंधू डोळे (रा. भुसावळ) व त्याची आई मालती चिंधू डोळे (रा. भालोद, ता. यावल) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.