गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित खटला निकाली
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात निम्न तापी प्रकल्प अंतर्गत सिंचन क्षेत्राखाली जाणाऱ्या जमिनीसाठी वनविभागाच्या न ३.१२ हेक्टर जमिनीवर पाटबंधारे विभागाकडून बांधकाम सुरू करण्यात आले होते. यात अनधिकृत बांधकामासंदर्भात वनविभागाचा १५ वर्षापासून प्रलंबित असलेला खटला निकाली निघाला आहे. पाटबंधारे विभागाकडून १० कोटी ४५ लाख रुपये भरपाई वनविभागाला मिळाली आहे.
निम्न तापी पाटबंधारे प्रकल्प अमळनेर तालुक्यात आहे. त्या अंतर्गत १७.०१ टीएमसी पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून देण्यात येणारा सिंचन लाभातून अमळनेर, चोपडा, पारोळा, धरणगाव तालुक्यातील ४३ हजार ६०० हेक्टर जमीन क्षेत्राला सिंचन लाभ होणार आहे. या जमिनी अंतर्गत जळगाव वनविभाग वनक्षेत्र स्थापित आहे. त्या जमिनीवर पाटबंधारे विभागाने २००९ मध्ये जळगाव वनविभागाची परवानगी न घेता बांधकाम सुरू केले होते.
याविरोधात वनविभागाने पर्यावरण वन विभाग मंत्रालयाकडे तक्रार दाखल करीत दावा दाखल केला होता. त्यानुसार वनविभागाची ३.१२ हेक्टर जमीन वनक्षेत्र वळवण्यासाठी निम्न तापी पाटबंधारे विभागाने वनविभाग जळगाव यांना १० कोटी ४५ लाख रुपये रकम आणि दंड देण्याचे निर्देश पर्यावरण वन विभाग मंत्रालयाने दिले असून या प्रकल्पाला मंजुरी दिली असल्याचे जळगाव वन विभागाकडून सांगण्यात येत आहे.