आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शासनाच्या विशेष अतिवृष्टी पॅकेजमधील सर्व सवलती चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याला लागू झाल्या असून, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे आणि इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी ₹१०,००० (३ हेक्टरच्या मर्यादेत) या दराने ७६.२५ कोटी रुपये इतके मोठे आर्थिक सहाय्य मंजूर झाले आहे.

या वाढीव मदतीमुळे चाळीसगाव तालुक्यातील ८१ हजार शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत मंजूर झालेला एकूण निधी १८५.६५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
काही विरोधकांनी अतिवृष्टी पॅकेजच्या सवलती चाळीसगाव तालुक्याला लागू झाल्या नसल्याचा अपप्रचार सुरू केला होता. मात्र, आमदार चव्हाण यांनी शब्द पाळल्यामुळे खोट्या आरोपांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्यांची बोलती बंद झाली आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी याप्रसंगी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. “शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम काही बँका कर्जखात्यात जमा करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यावर तात्काळ दखल घेत, तालुक्याचे तहसीलदार आणि जिल्हा लीड बँकेचे व्यवस्थापक यांना लेखी सूचना देऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाचा एक रुपयाही कर्जखात्यात जमा करू नये,” असे आदेश त्यांनी दिले आहेत.
आमदार चव्हाण यांनी माहिती दिली की, जिल्ह्याला अतिवृष्टी मदतीपोटी मिळालेल्या एकूण ५६२ कोटी रुपयांपैकी तब्बल १८५ कोटी रुपये (जवळपास ३३%) निधी एकट्या चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाला आहे.
आमदार चव्हाण यांनी या संवेदनशील निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह संपूर्ण महायुती सरकारचे आभार मानले आहेत.









