यंदा दुष्काळ परिस्थितीपासून सुटका मिळण्याचे संकेत
चाळीसगाव (प्रतिनिधी) : एकीकडे गिरणा धरण ९५ टक्के भरलेले असताना आडगाव शिवारातील मन्याड धरणही अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे. गुरुवारी दि. ५ सप्टेंबर रोजी मन्याड धरणात ४० टक्के साठा होता. गेल्यावर्षी भीषण अशा दुष्काळामुळे मन्याड धरणात शून्य टक्के जलसाठा होता तर गिरणा धरण ५४ टक्के भरले होते.
यावर्षी ऑगस्टमध्ये गिरणा धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरू केल्याने परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न यावर्षी सुटला आहे. त्यामुळे गिरणा परिसरात खरीप व रब्बी असे दोन्ही हंगाम जोमात येणार असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे २२ हून अधिक गावांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविणारे मन्याड धरण लवकरच पन्नाशी पार करणार आहे. सध्या धरणात येणारा पाण्याचा प्रवाह जोरदार आहे.
सिंचनासाठी वरदान ठरणारे हे धरण यावर्षी अजूनही अर्ध्यावरच असल्याने ६० टक्के जलसाठा उपलब्ध झाल्यावरच एक आवर्तनाची सोय होऊ शकेल.
गेल्यावर्षी गिरणा धरण ५४ टक्के धरण भरूनदेखील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते. त्यामुळे गिरणा व मन्याड परिसरात शेतकऱ्याला रब्बी हंगाम घेता आला नव्हता. यावर्षींदेखील मन्याड परिसरावर दुष्काळाची छाया आहे की काय, म्हणून शेतकरी चिंताग्रस्त होते.
परंतु २८ ऑगस्ट रोजी माणिकपूंज धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. ५ टक्के जलसाठा उपलब्ध असणारे मन्याड धरणाचा आलेख यामुळे चढता राहिला. २ सप्टेंबर रोजी मन्याड धरणात १२ टक्क्यांनी, ३ रोजी २५ टक्के तर ४ रोजी दुपारी १२ पर्यंत ३९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. एरवी १७ गावांतील पाणीपुरवठा योजनेचे कामदेखील अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच मन्याड परिसरातील टंचाईच्या झळा सोसणाऱ्या गावांना गिरणा धरणावरून पाणीपूरवठा होणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.