जिल्ह्यातील अनेक दिग्गज बीआरएस पक्षात प्रवेश करणार
जळगाव (प्रतिनिधी) – तेलंगाणा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील तसेच उत्तर महराष्ट्रातील अनेक आजी माजी राजकारणी दिग्गज प्रवेश करणार आहे. शुक्रवारी अनेकांनी पक्षप्रवेश केला. आगामी सर्व महापालिका, जिल्हा परिषद , लोकसभा आणि विधानसभा निवडणुका बीआरएस पक्ष स्वबळावर लढविणार असून पक्षाची ध्येय धोरणे लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणत पक्षाचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा ठाम विश्वास उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांनी शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला .
याप्रसंगी जळगाव जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकीअण्णा टेलर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नानासाहेब बच्छाव म्हणाले कि, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविला असून त्या राज्यातील शेती सिंचनाखाली आणली आहे. चंद्रशेखर राव यांचे सरकार शेतीसाठी ६० टक्के निधी खर्च करीत असून त्यामानाने महाराष्ट्र सरकार केवळ १२ टक्के खर्च कृषीसाठी करते. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या , शेतकऱयांच्या भल्यासाठी आखण्यात आलेले विविध धोरण यावर सरकारकडून निराशा व्यक्त होत आहे.
‘अब कि बार किसान सरकार ‘ असा नारा देऊन पक्ष मोठ्या ताकदीने महाराष्ट्र राज्यात उतरला असून चंद्रशेखर राव यांच्या विचारसरणीला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आगामी महापालिका,नगरपालिका, जिल्हा परिषद,विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये बीएआरस पक्ष मोठ्या ताकदीने मैदानात उतरणार असून पक्षात आज शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करून मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे नेतृत्व मान्य केले आहे. दरम्यान जळगाव शहरातील रस्ते , पाणी , मूलभूत सोयी सुविधा यावरही बच्छाव यांनी प्रतिक्रिया देऊन यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
यांनी केला पक्षप्रवेश
आज बीआरएस पक्षाचे नानासाहेब बच्छाव यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंदा वाणी (वराड सिम) ,भूषण सोनवणे ,प्रा. सुरेश अत्तरदे , बिपिन झोपे, भगवान सोनार, दीपक भारुळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.