दंगल पुलाजवळ दोन राऊंड फायर; दोन कुप्रसिद्ध संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
भुसावळ (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वेवरील जुन्या व्यवसायाच्या वादातून एका ३० वर्षीय तरुणावर पिस्तूलमधून दोन राऊंड गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराच्या या आवाजाने आणि हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील राहुल नगरात राहणारे आणि भुसावळ नगरपालिकेत नोकरीस असलेले धरमसिंग ऊर्फ गोलू रायसिंग पंडित (वय ३०) हे ६ जुलै २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराशेजारी असलेल्या ‘वैभवी ट्रेडर्स’ दुकानाच्या ओट्यावर बसलेले होते.
याच वेळी दंगल पुलाकडून मोटारसायकलवर दोन जण आले. जुन्या रेल्वेवरील व्यवसायाच्या वादाचा राग मनात धरून, मोटारसायकलवरून आलेल्या संशयितांनी धरमसिंग यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गाठले.
मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या अनिकेत जाधव याने त्याच्या जवळील पिस्तूल काढून थेट धरमसिंग यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे धरमसिंग यांनी प्रसंगावधान राखल्याने ते थोडक्यात बचावले. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करत तिथून पळ काढला.
याप्रकरणी फिर्यादी धरमसिंग ऊर्फ गोलू रायसिंग पंडित यांनी ७ जुलै रोजी दुपारी ३.१३ वाजता बाजारपेठ पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून: १) अमोल विनोद देवरे (रा. रमाबाई आंबेडकर नगर, भुसावळ) २) अनिकेत ऊर्फ कालु मनोज जाधव (रा. वाल्मिकी नगर, भुसावळ) या दोघांविरुद्ध गुन्हा रजि. नं. ३३६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ३५२, ३५१(२)(३), ३(५) सह शस्त्र अधिनियम (आर्म्स ऍक्ट) कलम ३/२५, २५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगावचे मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदारे बारबोले यांनी ७ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान बाजारपेठ पोलीस ठाणे आणि घटनास्थळाला भेट देऊन तपासाची पाहणी केली.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) राहुल तायडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या गुन्ह्यात अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक आरोपींच्या शोधात रवाना झाले आहे.









