संतोष बारसे, राखुंडे खूनप्रकरणी १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल
भुसावळ शहरात पोलीस बंदोबस्त कायम
जळगाव प्रतिनिधी) : भुसावळ शहरांमध्ये बुधवारी दि. २९ मे रोजी रात्री ९ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांचा बेछूट गोळीबार करून खून केल्याप्रकरणी १० ते ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेमुळे भुसावळ शहरात अजूनही तणाव आहे.
संतोष मोहन बारसे (वय ४८) आणि सुनील राखुंडे (वय ४५) या दोघांचा बुधवार दि. २९ मे रोजी जुना सातारा भागात मरीमाता मंदिरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी कारमध्ये बसलेले असताना बेछुट गोळीबार करून त्यांची निर्घूण हत्या केली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू ठेवला आहे. संतोष बारसे यांचे लहान भाऊ मिथुन मोहन बारसे (वय ४१, रा. मोहन पहिलवान नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील आठवड्यात पाण्याच्या टँकरवरून संतोष बारसे आणि संशयित आरोपी यांचे भांडण झाले होते.
या भांडणाच्या रागातून संशयित आरोपी राजू सूर्यवंशी आणि बंटी पथरोड यांच्या सांगण्यावरून हल्लेखोर आरोपींनी गोळीबार करून संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे याला जीवे ठार मारले आहे. याप्रकरणी शिव पथरोड, विनोद चावरीया, विष्णू पथरोड, सोनू पंडित, राजू सूर्यवंशी, बंटी पथरोड, करन पथरोड, नितीन पथरोड आणि आणखी दोन ते तीन अशा दहा ते अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी राजकुमार शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली. दरम्यान या दुहेरी खून प्रकरणामुळे भुसावळ शहरांमध्ये अजूनही तणाव असून मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त शहरांमध्ये तैनात केला आहे.