जामनेर तालुक्यातील वडगाव टीघ्रे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी ) ;- खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या ११ आणि १२ वर्षीय दोन लहान मुलांना जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांत त्यांचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची घटना जामनेर तालुक्यातील वडगाव टीघ्रे येथे घडली .
याबाबत सूत्रांनी दिलेली महिती अशी कि , वडगाव टीघ्रे येथे राहणाऱ्या जिजाबाई प्रकाश ठाकरे वय ४० यांचा मुलगा नाना प्रकाश ठाकरे वय ११ आणि त्यांच्या पुतणीचा मुलगा हेमंत हिरामण पवार वय १२ हे दोघे घराच्या बाहेर ९ जुलै रोजी खेळण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचा सर्वत्र शोध घेऊन देखील ते मिळून न आल्याने त्यांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद जिजाबाई ठाकरे यांनी ११ रोजी दिली होती . त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हि दोन्ही मुले कुणालाही न सांगता सहज म्हणून हेमंत पवार याच्या मावशीकडे आंबेवडगाव येथे बसने गेले होते. तेथे हेमंत हा मावशीकडे थांबला तर नाना ठाकरे हा धुळे जिल्ह्यातील मुकटी येथे त्याची आई जिजाबाई ह्या पूर्वी ज्यांच्याकडे कामाला होत्या त्यांच्याकडे गेला होता . त्यांनी फोन करून याची माहिती जिजाबाई ठाकरे यांना दिली .पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांच्यासह हवालदार राजेश वराडे आणि कॉ श्री. लहासे यांनी दोन्ही मुलांचा शोध लावून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले . याबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.