जळगाव शहरातील बसस्थानकात दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील नवीन बसस्थानकात ४२ वर्षीय बसचालक कर्तव्यावर असताना बसफेरी करून परत आल्यावर दुपारी साडेबारा ते १ वाजेच्या दरम्यान चक्कर येऊन कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. २७ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर पंडित साळुंखे (वय ४२, रा. पिंपळकोठा ता. एरंडोल) असे मयत बसचालकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, २ मुली, १ मुलगा असा परिवार आहे. ते राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेत गेली १८ वर्षांपासून कार्यरत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.(केसीएन)दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांना रवांजा गावाची फेरी करण्यासाठी ड्युटी देण्यात आली होती. तेथून फेरी पूर्ण करून आल्यावर जळगाव बसस्थानकात दुपारी साडेबारा वाजेला त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी तात्काळ त्यांचा शालक पवन कोळी यांना फोन करून बोलावून घेतले.
मात्र पवन कोळी हे येईस्तोवर ते चक्कर येऊन कोसळले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. ज्ञानेश्वर साळुंखे यांना मधुमेह होता तसेच बायपासदेखील झाली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान, बसचालक व वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.