शेतकरी संकटात, शासकीय मदतीची गरज
चंदकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- गेल्या दहा ते बारा दिवसापासून अधून मधून सुरू असलेल्या पावसामुळे व नैसगिक बदलाने पपई पिकावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे संपुर्ण बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मार्च महिन्यात लागवड झालेल्या या बागांवरील फळे लहान अवस्थेत असतांनाच पिवळी पडत असून
वाढ खुटत आहे. त्यामुळे फळे खाली जमिनीवर गळून पडत आहे. शेतकरी संकटात असून त्यांना शासकीय मदतीची गरज आहे.
तैवान जातीच्या संकरीत रोपांची लागवड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली गेली आहे. दरवर्षी या पपई फळांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. म्हणून शेतकरी केळी पिकाकडे पाठ फिरवून पपईकडे वळला आहे. मात्र यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावर व्हायरस आला आहे. याचा परिणाम म्हणून १५ ते २० रुपये प्रति किलो भावाने विकली जाणारी पपई आता अवघ्या ५ रुपये प्रति किलो दराने खरेदी केली जात आहे.
नैसर्गिक फटका त्याचबरोबर दराची घसरण अशा दुहेरी संकटात पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. मागच्या वर्षी १५ ते २० किलोने विक्रम केला होता. पण या वर्षीशेतकऱ्यांचे पूर्ण कंबरडे मोडले गेले आहे. म्हणून ईतर पिकांप्रमाणे या पिकाचाही पंचानामा करून उत्पादकांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.