पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांच्या शेतातून डंपरची जत्रा


विना क्रमांकाच्या वाहनांमुळे दहशत, रात्री १० नंतर पोलीस बंदोबस्ताची मागणी!
जळगाव, ( विशेष प्रतिनिधी ) – “अहो जिल्हाधिकारी साहेब… अहो पोलीस अधीक्षक साहेब… जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात वाळू माफियांनी मांडलेला नंगानाच कधी थांबणार? सामान्य शेतकरी आणि ग्रामस्थांना शस्त्रांचा धाक दाखवून गिरणा नदीचे पात्र ओरबाडणाऱ्या या गुंडांवर खाकीचा आणि प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही?” हा संतप्त सवाल आता शिरसोली प्र. न. येथील त्रस्त नागरिकांकडून थेट जिल्ह्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांना विचारला जात आहे. शिरसोलीत भरवस्तीतून रात्रं-दिवस सुरू असणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे.
पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांचे नुकसान; शस्त्रांचा धाक!
गिरणा नदीची वाळू ही अत्यंत दर्जेदार मानली जात असल्याने वाळू माफियांची नजर या भागावर खिळली आहे. सध्या मान्सूनचे आगमन झाले असून शेतकरी शेतात पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. अशा अत्यंत संवेदनशील काळात वाळू माफिया शेतकऱ्यांच्या थेट उभ्या पिकातून आणि शेतातून वाळूचे अवजड डंपर घालत आहेत.शेतकऱ्यांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास, वाळू वाहतूक करणाऱ्या चालकांकडे आणि त्यांच्या पाठीराख्यांकडे धारदार शस्त्रे असतात. या शस्त्रांचा थेट धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावले जाते. आगामी काळात यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकांचे अतोनात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विना क्रमांकाच्या डंपरची ‘जत्रा’; महसूल यंत्रणेचे लागेबंधे?
शिरसोलीच्या मुख्य वस्तीतून रात्रीच्या वेळी वाळूच्या डंपरची जणू काही जत्राच भरत असते. विशेष म्हणजे, यातील बहुतांश डंपरला नंबर प्लेट्सच नाहीत. विना क्रमांकाचे डंपर बिनधास्तपणे रस्त्यावरून धावत असल्याने वाळू माफियांचे चांगलेच पावत आहे.एकीकडे हा सगळा प्रकार उघडपणे सुरू असताना, स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकारी (सर्कल) यांना हा प्रकार दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्यांशी या महसूल कर्मचाऱ्यांचे काही लागेबंधे तर नाहीत ना? अशी शंकेची पाल ग्रामस्थांच्या मनात चुकचुकत असून गावकरी उघडपणे यावर चर्चा करत आहेत.
रात्री १० नंतर पोलीस बंदोबस्त द्या!
काल शिरसोलीत कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकासमोर वाळू माफियांनी थेट ‘थार’ गाडी आडवी लावून डंपर पळवून नेल्याची थरारक घटना ताजी आहे. यावरून वाळू माफियांचे धाडस किती वाढले आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे गावात शांतता लाभावी आणि रात्रीचा हैदोस थांबावा यासाठी रात्री १० वाजेनंतर शिरसोली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हाधिकारी आणि एसपींच्या कारवाईकडे लक्ष!
शिरसोलीतील हा वाळूचा अवैध धंदा आता केवळ चोरी पुरता मर्यादित न राहता, थेट गुंडगिरी आणि शेतकऱ्यांच्या छळापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे या गुंड प्रवृत्तीच्या वाळू माफियांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काय पावले उचलतात, विना क्रमांकाच्या वाहनांवर काय कारवाई करतात आणि शिरसोलीकरांना या दहशतीतून कधी मुक्त करतात, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.









