जळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
जळगाव (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, अहिल्या महिला संघ, कर्मचारी संघटना व सांस्कृतिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आज चंदू अण्णा नगर, निमखेडी शिवार येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मयोगीनी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश सुलताने हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रख्यात व्याख्याते सचिन देवरे, नगरसेवक विजय बांधेल,सुरेश सोनवणे,अतुल बारी, धनगर समाज महासंघाचे माजी महामंत्री सुभाष सोनवणे, प्रभाकर न्हाळदे, दिलीप धनगर, सुभाष करे, संदीप तेले, अरुण ठाकरे, वसंत भालेराव, गणेश बागुल, हिलाल सोनवणे, मंजुषा सूर्यवंशी, प्रमिला कंखरे, पूनम शिरोळे, प्रा. विजय शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख व्याख्याते सचिन देवरे यांनी आपल्या बहारदार व अभ्यासपूर्ण शैलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्राचा सखोल परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, “अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि धर्मनिरपेक्ष प्रशासनाचा आदर्श घालून दिला. त्यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून प्रत्येक पिढीने त्यांच्या विचारांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.” तसेच “अहिल्यादेवींच्या कार्यातून स्त्रीशक्ती, कर्तृत्व आणि राष्ट्रसेवेचा संदेश मिळतो,” असेही त्यांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी आमदार सुरेश भोळे व उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बागुल यांनी केले. सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी तर आभार प्रदर्शन तुळशीराम सोनवणे यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी धनगर समाज महासंघ प्रदेश सदस्य पदी दिलीप धनगर, धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्षपदी गणेश बागुल कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी तुळशीराम सोनवणे यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र सोनवणे, प्रवीण पवार, ॲड. शरद न्हाळदे, हर्षल पवार, अनिल सुलताने, मयूर ठाकरे, सुभाष खोमणे, संतोष कचरे, यशवंत शिरोळे आदींनी विशेष परिश्रम घेतले.










