जळगाव शहरातील समता नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगरातील बंद असलेल्या घराला अचानक आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास समतानगरातील धामणगाव वाडा परिसरात घडली. या घटनेत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
किशोर सदाशिव चव्हाण यांचे समता नगरातील धामणगाव वाडा परिसरात पत्र्याचे घर आहे. शनिवारी दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चव्हाण हे कामावर गेले होते. तर त्यांच्या पत्नी बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी बंद असलेल्या घराला अचानक आग लागली. ही घटना समजताच या परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन दलाला माहिती दिली. त्या वेळी एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
त्यापूर्वीच आजूबाजूच्या नागरिकांनी पाण्याच्या सहायाने आग विझविली. मात्र तोपर्यंत घरातील कपडे, अंथरुण, धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. घटनेत घरमालकाचे सुमारे ३० हजारापेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने प्रशासनाने त्यांना आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.