चाळीसगाव ;- तालुक्यातील वरखेडे शिवारात दोन महिन्यापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे.दर दोन चार दिवसाआड एक पशुधन बिबट्याकडून फस्त केले जात आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशा भयभीत झाले आहे.दोन महिन्यात पशुधन हल्ल्ल्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या आहेत.हे हल्ले बिबट्याकडून झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.मात्र वन विभाग तडसाकडून हे हल्ले झाल्याचे भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करीत आहे. दरेगाव रस्त्यावर शेतकरी राजेंद्र कच्छवा यांच्या शेतातील लोखंडी जाळी ओलांडून वासरू फस्त केले. आज दरातांडा परिसरात नाना शायसिंग कच्छवा यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेला तीन वर्षाच्या गोऱ्ह्याचा नरडीचा घोट बिबट्याने घेतला. विशेष म्हणजे नाना कच्छवा यांच्यासह परिसरातील शेतकरी रात्री शेतात बारा-एक वाजेपर्यंत थांबून होते. त्यानंतर ते घरी गेले आणि सकाळी 7 हा प्रकार साई राठोड यांना समजला त्यांनी शेतमालक नाना कच्छवा यांना माहिती दिली.