जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन करणे, विक्री व साठवणूक करणे व वापर करण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात येत आहे, जळगाव जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, साठवणूकदार यांना रासायनिक गुलालाचे विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन आदेश पारीत केले आहे.
जिल्ह्यात ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणपती मिरवणुका व विसर्जनाचा कार्यक्रम दृष्टीकोनातून गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची व जळगाव जिल्हयातील प्रमुख अधिकारी तसेच संबंधित सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, कार्यकर्ते यांची ४ सप्टेंबर, २०२४ रोजी जिल्हादंडाधिकारी जळगाव यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी व संबंधित गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांनी रासायनिक गुलालाचा वापर करण्यावर प्रतिबंध करण्याबाबत कळवले आहे.
श्री गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने रासायनिक गुलालचा वापर केल्याने काही प्रमाणात पर्यावरणाची हानी व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. रासायनिक गुलालमध्ये वापरले जाणारे घटक उदा. लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, क्रोमिअम, आयोडाईड व अॅल्युमिनियम ब्रोमाइंड चा वापर मुख्यतः करण्यात येत असल्याने यामुळे डोळ्यांना अॅलर्जी, किडनीला हानी, अस्थायी अंधत्व, ब्रॉन्कियल अस्थमा, कॅन्सरचे कारण होऊ शकते. तसेच या रसायनांमुळे माती. पाणी व हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलालमध्ये वापरण्यात येणारे रसायन व रंग हे जलस्रोतांमध्ये मिसळल्यास जलप्रदूषण होण्याची शक्यता आहे.
रासायनिक गुलालला पर्याय म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिन सुरक्षित पर्याय म्हणून नैसर्गिक घटकापासून बनविण्यात येणारे (हर्वल / जैविक घटकापासून तयार करण्यात आलेला) गुलालाचा वापर करण्यात यावा, वरील प्रमाणे रासायनिक गुलालाचे उत्पादन करणे, साठवणूक करणे व वापर करणा-या आस्थापना / घटक / व्यक्ती यांचेवर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रदान करण्यात येत असून त्यांनी स्वतंत्ररित्ये पथके तयार करुन आवश्यक ती कारवाई करावी. सदर आदेशाचे कोणतीही व्यक्ती / संस्था आस्थापना / घटक यानी उल्लंघन केल्यास सदर बाब ही पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ५ अन्वये शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिध्दी आदेशित केले आहे.