ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार
जळगाव (प्रतिनिधी) नेपाळ येथील बस दुर्घटनेतील २५ मृतदेहांचे शव विशेष एअर ॲम्बुलन्स ने जळगाव विमानतळावर दाखल झाले आहे. या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्यासह विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी हे विमानतळावर दाखल झाले आहेत.
गोरखपूर येथून विशेष विमानाने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे हे २५ शव आणि चार ते पाच जखमी नागरिकांना घेऊन जळगाव विमानतळावर दाखल झाले आहेत. विमानतळावर २५ विशेष रुग्णवाहिका दाखल असून सोबत आरोग्य पथकही दाखल झाले आहे. आरोग्य पथकामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, मोहाडी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण सोनवणे, डॉ. विजय कुरकुरे,यांचा समावेश आहे. तर विमानतळावर भुसावळ तालुक्यातील सर्व मयत भाविकांचे नातेवाईक मोठा संख्येने उपस्थित झाले आहेत.
ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यामध्ये मृतदेह देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. बस दुर्घटनेतील पहिल्या बसमधील सर्व भाविक सुखरूप असून त्यांना गोरखपूर येथून विशेष रेल्वेने जळगाव येथे आणण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याकडून मिळाली आहे.