स्वादासाठी नव्हे तर जीवन निर्वाहासाठी भोजन करावे. स्वास्थ्य, साधनेसाठी जेवण करावे. हा नियम साधू व श्रावक यांच्यासाठी लागू आहे. काही व्यक्ती याच्या विरूद्ध वागतात, जगतात जणू खाण्यासाठीच त्यांचा जन्म झाला आहे. जैन धार्मिक साहित्यात ‘उणोदरी’ ही उत्तम संकल्पना अवलंबली जाते. उणोदरीचा अवलंब प्रत्येकाने करावा. जपानी व्यक्ती वयाची शंभरी गाठतात कारण ते त्यांचे २० टक्के पोट रिकामे ठेवतात. निदान जपानी लोकांचे तरी अनुकरण करावे असे आवाहन प.पू. सुमित मुनीजी महाराज साहेब यांनी आजच्या प्रवचनातून केले.
आजच्या लोकांचे, पिढीच्या वागण्याची तऱ्या निराळीच दिसते. ते दोनच गोष्टीत व्यस्त असतात. एक म्हणजे, ‘जिमने जाना है…’ आणि जे खाल्ले ते पचविण्यासाठी ‘जिममें जाना है…’ हेच करताना दिसतात. आपले पोट भरले की नाही याबाबत तर कुणा कुणाला कळतच नाही. कुलरमध्ये पाणी टाकतो, टाकीत किती टक्के पाणी भरले याची टक्केवारी दिसते परंतु काही खाणाऱ्या व्यक्ती अशा असतात की, त्यांना पोट किती टक्के भरले हे कळतच नाही मुळी! आजच्या पिढीच्या लोकांनी आहाराचे नियम मोडीस काढलेले आहेत. पूर्वीच्या पिढीच्या व्यक्तींचे असे होते की, पूर्वी घरी जेवण बनविले जाई व शौचाला बाहेर जात असत परंतु आज बाहेरून खाऊन येतात व घरात शौचाला जातात. खरे तर खाणे पिणे हे विवेकपूर्णच असायला हवे. दोन अडीच इंचाची जीभ संतुष्ट होत नाही. याबाबत मार्मिक पद्धतीने श्रावक श्राविकांना आजच्या प्रवचनात समजावू सांगितले. ‘नो हरी’, ‘नो वरी’ आणि ‘नो करी’ स्वस्थ, यशस्वी जगण्याचे तीन सूत्र याबाबतची मालीका सुरू आहे.