रावेर (प्रतिनिधी) : राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ एचपी पर्यंतच्या पंपांच्या वीज बिल माफीचा शासन निर्णय घेतला आहे. मात्र, रावेर – यावल परिसरातील शेतकरी, ज्यांचे पाणी पातळी खोल आहे आणि जे १० एचपी किंवा १५ एचपी पंप वापरतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन करणार नाही असा इशारा काँग्रेसचे युवानेते व आमदार शिरीष कुमार चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरींनी यावेळी दिला.
महाविकास आघाडीने आज २७ जुलै शनिवार रोजी रावेर तहसील कार्यालयात निवेदन दिले की, १० एच पी व १५ एच पी पंपांचा सुद्धा या योजनेत समावेश करण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांवर होणारा अन्याय टळेल. नायब तहसीलदार संजय तायडे यांना हे निवेदन देण्यात आले.
या वेळी काँग्रेसचे युवानेते धनंजय चौधरी, काँग्रेस तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, कृ.ऊ.बा. समिती रावेर उपसभापती योगेश पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, माजी पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, राष्ट्रवादी ओ.बी.सी. सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, राहुल महाजन, परवेज पठाण उपस्थित होते.