जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांचे निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी एकाच वेळी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव जिल्हा व त्या अंतर्गत असलेल्या सर्व तालुका न्यायालयामध्ये शनिवारी दि. २७ रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यांत आलेली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी दिली आहे.
वर्षानुवर्षे ऐन केन कारणाने प्रलंबित राहणारे खटले आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवुन वाद मिटवुन घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार संपुर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत दि. २७ जुलै रोजी आयोजित करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव तर्फे देण्यात आली. (केसीएन) विधी सेवा प्राधिकरण, जळगांव व जिल्हा वकील संघ, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी ही राष्ट्रीय लोकअदालत जळगांव जिल्हातील संपुर्ण न्यायालयात आयोजीत केली जाईल. जळगांव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. क्यु. एस. एम. शेख तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली लोकअदालतीस प्रारंभ होईल.
जळगांव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तकार निवारण मंच येथील तडजोड योग्य प्रकरणे देखिल त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली केले जाणार आहेत. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपुर्ण जिल्हातून मोठया प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपनी यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठया प्रमाणात रक्कम वसुली होवुन मिळण्याची शक्यता आहे. वादपुर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वणी कंपन्या, दुरध्वणी कार्यालयांनी थकीत रकमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्थावित केलेले आहे.
ज्या पक्षकारांना तडजोडीने सदरचे आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधीत सर्व पक्षकार व त्यांचे विधिज्ञ यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपआपले खटले निकाली काढावे. तसेच ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील त्यांना सुध्दा ऐनवेळी खटले निकाली काढण्याची संधी देण्यात आलेली आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, व जास्तीत जास्त खटले दि. २७ जुलै रोजीच्या राष्ट्रीय लोकअदालतीत समोपचाराने निकाली करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांवतर्फे करण्यात आलेले आहे.