गेल्या वर्षात शंभर टक्के निधी खर्च करून जिल्हा राज्यात अग्रेसर
जळगाव : गेल्या आर्थिक वर्षात ६५७ कोटीचा निधी विविध विकासकामासाठी खर्च झाला असून चालू आर्थिक वर्षात ७५५. ९९ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. राज्यात विकास कामांसाठी शंभर टक्के निधी खर्च करण्यात जळगाव जिल्ह्याची आघाडी असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३- २४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. ५१०. ०० कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने संपुर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक ३१ मार्च, २०२४ अखेर रु. ५१०. ०० कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे. किरकोळ रु. ४०००/- इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर तांत्रिक कारणास्तव पुनर्विनियोजन करता येत नसल्याकारणाने शासन स्तरावर समर्पित करण्यात आलेला आहे.
तसेच अनुसुचित जाती उपयोजना जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. ९२ कोटी नियतव्यय मंजुर होता तो पुर्ण निधी खर्च झाला असून आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी ५५.९२ कोटी नियतव्यय मंजुर होता तो, संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे. आ. किशोर पाटील यांनी जिल्ह्यातील शहीद जवानांचे स्मारक बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात तरतुद करण्याची मागणी केली असता सर्वानुमते याविषयाला मंजुरी देण्यात येवून तसा ठराव करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचे नियोजन केले जाणार आहे.