शिरसोली ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचाराचा वास
जेष्ठ नागरिकांसह ग्रामस्थांच्या पाहणीत वेगळेच सत्य समोर
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथील ग्रामपंचायतीत नायगाव धरणावर पंधराव्या वित्त आयोगातून ९ लाखांच्या रकमेत सोलर पंप उभारण्यात आल्याची नोंद आहे. मात्र सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली असता तेथे प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारचे सोलर पंप लावण्यात आलेले नाही, असे चित्र दिसून आले. मग पंधराव्या वित्त आयोगातील ९ लाख गेले कोठे ? असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे. याबाबत “केसरीराज” ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते.
तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील ग्रामपंचायतीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत २७ लाख ६९ हजार रुपये भ्रष्टाचार झाला असल्याबाबत ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी व नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांना शुक्रवारी भेट घेऊन माहिती दिली आहे. तसेच, दोषी सदस्यांवर व ग्रामसेवकांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी शनिवारी दि. २५ रोजी सकाळी नायगाव धरणावर जाऊन पाहणी केली.
तेथे पाहणी केली असता तेथे सोलर व त्यावरील पंप दिसून आलेले नाही. नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे, अशी माहिती नागरिकांनी दिली. सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ नागरिक पुनमचंद भादू माळी यांनी सांगितले कि, ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेले १७ कार्यकारी सभासद आहेत. सत्ताधारी सभासदांनी व ग्रामसेवक यांनी एकमत करुन पंधराव्या वित्त आयोगातून रक्कम काढून भ्रष्टाचार केलेला आहे. शिरसोली प्र.न. शिवार, नायगांव धरणावरील सोलर ७ लाखाचे व त्यातील पंप २ लाखाचा असे एकूण ९ लाख रुपये भ्रष्टाचार झाला आहे. सत्ताधा-यांनी बँकेतून काढलेले पैसे शिक्षणासाठी ५ लाख रुपये तसेच कौशल्य विकासासाठी ०३ लाख रुपये, शिबीरसाठी १० लाख ६९ हजार रुपये असे १८ लाख ६९ हजार रुपये अशा प्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे. वरील सर्व एकूण भ्रष्टाचार २७ लाख ६९ हजार रुपये झालेला आहे.
“केसरीराज” ने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताना ग्रामसेवक चिंचोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले होते की, टेंडर प्रक्रियेनुसार रीतसर कामे झाली आहेत. कामात अनियमितता नाहीत. मात्र शनिवारी ग्रामस्थांनी केलेल्या पाहणीत कुठल्याही प्रकारचे कामे झालेली दिसून आलेली नाहीत. या सर्व प्रकारची चौकशी आता जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.