जळगाव तालुक्यातील पाथरी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- कर्जाला कंटाळून तालुक्यातील पाथरी येथील शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भागवत दगडु पाटील (वय ६५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. तालुक्यातील पाथरी येथे भागवत पाटील हे वास्तव्यास असून त्यांची गावालगतच भावासोबत सामाईक शेती आहे. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. दरम्यान, आज दुपारच्या सुमारास ते आपल्यात शेतात गेले. काही वेळ त्याठिकाणी थांबल्यानंतर ते त्यालाच लागून असलेल्या भावाच्या शेतातमध्ये गेले. याठिकाणी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत भागवत पाटील यांनी आपली जीवनयात्रा संपवली.
घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच त्याठिकाणी धाव
घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.