स्मिता वाघ यांच्या विजयासाठी कार्यकर्ते कितपत घेणार मेहनत ? पक्षांतर्गत नाराजी कायम..!
लोकसभा निवडणुकीत आता हळूहळू रंगत सुरु झाली आहे. भाजपच्या उमेदवार माजी आ. स्मिता वाघ यांच्याकडून प्रचार आता सुरु झाला आहे. काही गावात जाऊन त्या लोकांना भेटत आहे. अमळनेर शहरात स्मिता वाघ यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागतही झाले आहे. स्मिता वाघ यांच्या विजयासाठी भाजपने नुकतीच पक्षाची व महायुतीची बैठक घेतली आहे. त्यात स्मिता वाघ यांना विजयी करण्याबाबत भाजपच्या नेत्यांकडून आवाहन करण्यात आले.
जळगाव लोकसभा मतदारसंघात विधानपरिषदेच्या माजी आ. स्मिता वाघ यांची लोकप्रियता व उमेदवारीबाबत चर्चा फारशी नसताना पक्षाने त्यांचे नाव घोषित करण्यामागे नेमके काय कारण आहे हे अद्यापही भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना समजलेले नाही. याबाबत भाजपच्या जळगाव जिल्ह्यातील काही पक्षश्रेष्ठी, नेत्यांशी तसेच कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. त्यातील सारांश पाहिला तर अनेक आश्चर्यचकित बाबी समोर येतात. जळगाव मतदारसंघात स्मिता वाघ यांना मागीलप्रमाणे यंदाही उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील वर्षी पक्षाने ऐनवेळी उन्मेष पाटील यांना पक्षाचा एबी फॉर्म देत स्मिता वाघ यांचे तिकीट रद्द केले होते.
यंदाही स्मिता वाघ यांना जाहीर झालेले तिकीट अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवडलेले नाही, हेच दिसून येत आहे. विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे कापलेले तिकीट पाहता अनेक कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. उन्मेष पाटील हे टॉप टेन मधील खासदार असताना नेमके भाजपच्या प्रगतिपुस्तकात उन्मेष पाटील का नापास झाले ते समजण्यापलीकडे आहे. त्यामुळे यंदाही स्मिता वाघ यांचे तिकीट ऐनवेळी कट होऊ शकते हि चर्चा जोर धरत आहे. स्मिता वाघ यांना निवडून आणण्याकरिता भाजपचे पदाधिकारी नेमकी किती मेहनत घेतात याबाबत साशंकता कायम आहे. यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नाही हे तितकेच खरे आहे.