जळगाव जिल्ह्यात पंचनाम्याची गरज
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील चोपडा, अमळनेर, यावलसह काही भागांत शुक्रवारी दि. १ रोजी पुन्हा बेमोसमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्यातील पश्चिम भागातील वढोदा येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास पाऊस व वादळी वाऱ्याने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पपई, मका, केळी पिकाचे नुकसान झाले आहे.
वढोदा येथील कापणीवर आलेली तीनशे पपईची झाडे उद्ध्वस्त झाली. पूर्ण बाग वाऱ्याने उन्मळून गेली. शेखर गोकुळ पाटील यांची केळी बागची २०० ते ३०० झाडे उन्मळून पडले. जास्त प्रमाणात मका व पपईचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दहिगावसह परिसरात बेमोसमी पावसाने गहू, हरभरा, मका पिकाचे नुकसान झाले. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. या पावसाने गहू, मका आणि हरभऱ्याचे नुकसान झाले आहे तर वीटभट्ट्याधारकांची धावपळ झाली. आधीच गव्हावर अळीचा प्रादुर्भाव होता.
त्यात उत्पन्न कमी निघण्याची भीती निर्माण झाली होती आणि त्यातच निसर्गातने बेमोसणी पावसाचा फटका शेतकऱ्याला दिलेला आहे. मका, गहू आणि हरभरा उत्पादित होण्याच्या मार्गावर आहे. उत्पन्न होत असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.