श्री रामायण कथा प्रारंभ, सिद्धेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धारानिमित्त उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रभू श्री राम सहज, साधे सरळ पण दृढनिश्चयी आहे. केवळ आपल्या मित्रांचेच शुभचिंतक नाही तर त्याच्या आश्रयाला येणाऱ्या शत्रुंनाही अभय देणारा राजा आहे. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या अशा सर्व भुमिकांमध्ये अनुकरणीय आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, असे मार्गदर्शन ह.भ. प. प्रभाकर महाराज यांनी केले.
शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातर्फे जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शुक्रवारी दि. १ मार्च रोजी सकाळी जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूजनाला सुरुवात करण्यात आली. विविध विधी व मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठा कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. तीन दिवस विविध पूजन केले जाणार आहे. यानंतर दुपारी २ वाजता मलकापूर तालुक्यातील कुंड येथील ह. भ. प. प्रभाकर महाराज यांची श्रीमदनोस्वामी तुलसीदासजी कृत श्री रामायण कथा श्रवणाला प्रारंभ झाला.
सुरुवातीला महाराजांचे स्वागत करून त्यांना वंदन करण्यात आले. त्यानंतर श्री रामायण ग्रंथाचे पूजन झाले. प्रसंगी भाविकांना पहिल्या दिवशी हभप प्रभाकर महाराज यांनी मार्गदर्शन केले. प्रभू श्री राम म्हणजे आत्मा-ज्योती. म्हणजेच, आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे. राम नेहमी आपल्या हृदयात असतो. राम हे आपल्या आत्म्याचे प्रतीक आहे. लक्ष्मण हे सतर्कतेचे प्रतीक आहे. सीता हे मनाचे प्रतीक आहे. तर रावण हे अहंकार आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे, असे ह. भ.प. प्रभाकर महाराज यांनी सांगितले. यानंतर संध्याकाळी हरिपाठ घेण्यात आले. शनिवारी २ मार्च रोजी दुपारी १ वाजता कथेतील विविध पैलूंवर प्रभाकर महाराज माहिती सांगणार आहेत. भाविकांनी या कथाश्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.