जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील आझाद नगर येथे लग्नाच्या मंडपातून दारूच्या नशेत दुचाकी घेऊन जात असताना थांबविल्याचा रागातून एका मद्यपीने नाजीम राजू पिंजारी (३२, रा. खंडेराव नगर) यांच्यावर चॉपरने वार करून गंभीर दुखापत केली. ही घटना शनिवार दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नाजीम पिंजारी यांच्या काकाच्या मुलाचे लग्न असल्याने ते आजाद नगर येथील काकाच्या घरी गेले होते. त्या परिसरातील एक तरुण दारूच्या नशेत मंडपाजवळ लावलेल्या दुचाकींजवळून जात होता. नाजीम याने गाडी हळू चालव, मुलं खेळत आहे असे सांगितले. याचा राग आल्याने मद्यपीने शिवीगाळ करून निघून गेला. रात्री ९ वाजता लग्न मंडपाजवळ मद्यपी तरुण अन्य तीन जणांसह आला. चौघांनी नाजीमवर चॉपरने हल्ला करत जखमी केले. याप्रकरणी रविवार, २५ फेब्रुवारी रोजी पिंजारी यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









