चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) :- महानुभाव पंथ प्रवर्तक श्रीचक्रधर स्वामी अवतारदिन शासनाने सर्वत्र साजरा करावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून सुरु होती. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर यंदा शासनाने दखल घेत श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा परिपत्रकात समावेश केला आहे.
ज्यांनी खऱ्या अर्थाने मराठीला धर्मभाषेचा दर्जा देऊन राजसिंहासनावर बसविले, त्यांचा अवतारदिन शासन स्तरावर साजरा व्हावा, ही महानुभाव पंथातील मान्यवर संत- महंत, आचार्य मंडळींच्या शुभचिंतनाने मागणी शासनाकडे रेटुन धरली. समाज सुधारणेची सुरुवात करून मानवतेचा संदेश देणारे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे महाराष्ट्राच्या जङणघडणीत अमूल्य योगदान आहे.
सत्य, अहिंसा, मानवता, समानता या मूल्यांतून दिलेल्या शिकवणूकीतून समाजप्रबोधन झाले. महाराष्ट्रात तिन टक्के तर देशात दिड कोटी तर जगभरात मोठ्या संख्येने महानुभाव उपासक असूनसुद्धा शासन परिपत्रकात अवतारदिनाचा समावेश नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याच्या अवर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव ज. जि. वळवी, अवर सचिव र. रा. पेटकर, अवर सचिव श्री. सदाफुले यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. कृपाल तुमाने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषि मंत्री अब्दुल सत्तार, आमदार रमेश बोरनारे, आमदार श्वेता महाले, आमदार सुनील भुसारा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले.
यंदाच्या हिवाळी अधिवेशन काळात अंतिम मंजूरीसाठी ही फाइल मुख्यमंत्री कार्यालयात सह सचिव व्यंकटेश भट यांचेकड़े पाठविण्यात आली. त्यावर १८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश करण्यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाला लिखित निर्देश दिले होते. कवीश्वरकुलाचार्य महंत श्रीकारंजेकर बाबा, शिवसेनेच्या (शिंदे गट) जेष्ठ पदाधिकारी शुभांगी नांदगावकर, प्रशासकीय अधिकारी साजनकुमार शेंडे यांच्या विशेष प्रयत्नांतून २०२४ च्या परिपत्रकात श्रीचक्रधर स्वामी अवतारदिनाचा समावेश करण्यात आला.
या निर्णयामुळे भविष्यातील अनेक बाबी सुकर झाल्या असून मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालयात, राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाद्रपद शु. द्वितीया या तिथीला अवतारदिन साजरा करण्यात येईल, पंथीय साधकांसह मराठीप्रेमींसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यासंदर्भातील स्वतंत्र परिपत्रक शासन लवकरच काढेल, असे महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव र. रा. पेटकर यांनी कळविले आहे.