जळगाव तालुक्यातील कानळदा येथे ग्रामपंचायतीसमोर ठेवली अंत्ययात्रा
जळगाव (प्रतिनिधी) – नागरिकांना जिवंतपणी चांगले रस्ते मिळत नाही हे बोलले जात असले तरी मृत्यू झाल्यावर देखील खराब रस्त्यांमुळे जायला पायवाटदेखील शिल्लक राहत नाही, याचा प्रत्यय तालुक्यातील कानळदा येथे शनिवारी ९ सप्टेंबर रोजी आला. अंत्यसंस्कारकरिता स्मशानभूमीत जायला जागा नसल्याने थेट ग्रामपंचायतीसमोरच संतप्त ग्रामस्थांनी अंत्यविधी आटोपण्याची तयारी केली. अखेर सरपंच, सदस्यांनी धावपळ करीत स्मशानभूमीचा रस्ता खडी, मुरूम टाकून तयार केला. त्यानंतर अंत्यविधी ग्रामस्थांनी उरकला.
कानळदा येथील वना सातोडे यांचे रात्री निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्मशानभूमीच्या वाटेवर अंत्ययात्रा आल्यावर स्मशानभूमीकडे जाणारी वाट पूर्णत: पाण्यात आणि चिखलात गेल्याची जाणीव झाली. काही जणांनी ग्रा.पं.कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अनेक युवक सरसावले. त्यांनी अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायत समोर टाकले. त्यानंतर सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्यासह सदस्यांनी धाव घेतली. तेव्हा शाब्दिक चकमक उडाली.
ग्रामस्थांचा रोष पाहून ग्रामपंचायतीने तत्काळ स्मशानभूमीचा रस्ता तयार करुन देण्यासाठी तयारी दाखविली. ऐनवेळी दखल घेण्यापेक्षा यापूर्वीच स्मशानभूमीची वाट सुकर करायला हवी होती, असा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला. सरपंच सपकाळे यांनी यंत्रणेला हाताशी घेत तत्काळ स्मशानभूमीचा चिखल दूर सारला आणि मुरुम, माती, वाळूच्या माध्यमातून हा रस्ता तयार करुन दिला. त्यानंतर ग्रामस्थांचा संताप कमी झाला. त्यांनी अंत्यसंस्कारासाठी आणलेले साहित्य ताब्यात घेत स्मशानभूमी गाठली आणि वना सातोडे यांच्यावर अंत्यसंस्कार पार पाडले.
दरम्यान, यापूर्वीही स्मशानभूमीच्या रस्त्यावरुन कानळद्यात वाद झाला होता. त्यावेळी अनेकांनी संताप व्यक्त करीत आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. पुन्हा तोच प्रकार घडला. त्यामुळे ग्रा.पं.ने ऐनवेळी करुन दिलेल्या रस्त्यामुळे शनिवारी अंत्यसंस्कार आटोपले. मात्र हा तकलादू रस्ता काही दिवसात पुन्हा बंद होईल आणि तिथल्या चिखलामुळे पुन्हा अंत्यसंस्कारासाठी कसरत करावी लागेल, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. कायमस्वरुपी रस्ता व्हावा, अशी मागणीही यानिमित्ताने करण्यात आली आहे.